Friday, June 05, 2009

पार्टी

Entrance ला रात्रीच्या अंधारातही चमकणारी रेडियमची पाटी "अपेक्षा - अनुराग" येणार्या प्रत्येक कारच्या हेड्लाईटला योग्य अंतरावर थांबवित होती. ड्रायव्हरशेजारचे दार अलगद उघडताच प्रथम ख्रिच्शन डायोर किंवा नीना रिकीचा दरवळ आधी बाहेर यायचा, मग डिझायनर सॅंडल्स आणि हिरेजडित नाजुक हातांपाठोपाठ तलम कपड्यांची सळसळ!ड्रायव्हर्च्या जागी असलेली एक भपकेबाज व्यक्ती झटपट त्या सळसळीबरोबर येऊन दोघांचे चार हात कधी नमस्तेला तर कधी शेकहॅंडला तर क्वचित हलक्याशा मिठीत जोडले जायचे.

एक एक करत सर्वं कपल्स आपली हजेरी प्रशस्त लॉनवर किंवा राजेशाही दिवाणखान्यात लावत होते. अपेक्षा व अनुराग हे होस्टच मुळी सर्वांना जातीने ड्रींक्स देत स्वागत करत होते. मुख्य डिनरला बराच अवकाश होता. आपसूकच छोट्या छोट्या घोळक्यात संवाद चालू होते.

"अपेक्षाला बरं जमतं या वयात अजूनही मिरवायला."
"तिला दुसरं काय काम असतं?"
"तसं कसं! नाही म्हंटलं तरी २५ वर्षे झालीत लग्नाला."
"मग अजून कशी पस्तिशीची दसते?"
"चल, पार्लरमध्ये जाऊन येते."
"पार्लरमध्ये तर तूही जाते मग तू का चाळीसची असून पन्नासची दिसते?"
"ते जाऊ दे. पण अनुराग अगदीच सीसी आहे"
"म्हणून काही ती पस्तिशीची दिसत नाही हं."
"तसं नाही. अनुराग तिला फ़क्तं तोंडी लावायला. सेलीब्रेट तर ती शॅंपेननेच करते."
"सुरुवात शॅंपेनने तर मेन कोर्स मध्ये कोण?"
"ते मी कसं सांगू? पाच कोर्सचे डिनर असेल तर?"
"खरं कि काय!"
"अपेक्षा म्हणजे आमच्या old बूर्झ्वा क्लबमध्ल्या उखाण्यासारखी!
गोविंदरावांबरोबर सिनेमा पाहिला सायको,
अरविंदरावांचे नाव घेते चिमणरावांची बायको!"

हास्याचा किलकिलाट! अजून एकदा, पुन्हा एकदा !
तर पुरुष मंडळी प्रामुख्याने शॅंपेनचा आस्वाद घेत अंदाज घेत होती.
" हा अनुराग म्हणजे काही कळत नाही. सदैव हसतमुख. worries कधी नाहीतच."
" लपवत असेल. हल्ली सामान्य असणारा माणूससुद्धा सुखी असण्याच्या acting मध्ये परेश रावलला मागे टाकेल"
"acting कुणिही दोन दिवस करेल. गेली पंचवीस वर्षे तो सुखी आहे हे मी माझ्या दु:खी नजरेने टिपले आहे."
"ते बघता बघता तुझे दु:ख वाढल्याचे मी पाहिले आहे. (आणि त्यामुळे तुझे दु:ख थोडे कमी झाल्याचे मी पाहिले आहे- एक कुत्सित कटाक्ष)"
"पुरे. लाकडं जाळण्याचा प्रकार थांबवा."
"लाकडं पूर्वी होती. आता रिफ़ायनरी जाळता येईल इतकं इंधन आहे."
"बरं एवढं जळूनही एक चिंता नेहमी. याचं कधीच कसं लफ़डं झालं नाही व झालं असेल तर कळलही नाही."
"अरे त्याला दु:ख झालं असेल पण कळलं नसेल"
" तसं कसं शक्यं आहे? आपल्यामध्ये असा कोण आहे ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही एकाही महत्वाच्या बाबतीत?"
" अरे आपण सगळे नजरांच्या दुर्बिणी लावून एक दुसर्याला दुरून पाहात गंमत करत असतो. कोणाची P.A., दुसर्याची client, कधी आडवळणाची air-hostess, कुणी सुटलय का यातून?"
" आता पुरे. नाव नका घेऊ. नाहीतर कलीयुगातले महाभारत व्हायचे."

तेवढ्यात announcement झाली.
मंडळी, अपेक्षा व अनुराग आपल्याला काही सांगू इच्छिताहेत.
शॅंपेनचे ग्लासेस एकाच दिशेने वळलेत. सर्वं नजरा एकाच ठिकाणी खिळल्या. काही डोळ्यांमध्ये मिस्किल छटा, तर काहींमध्ये ’आता काय नवीन’ चा बोजडपणा.

अनुरागने सुरुवात केली.

"२५ वर्षे! हो. आम्ही गेली पंचवीस वर्शे एकत्र आहोत. made for each other म्हणून नव्हे तर "MAD FOR EACH OTHER" गेल्या पंचवीस वर्षात आम्ही जितकं इतरांना पाहिलं तितकं त्यांच्या नजरांमध्ये आधी कौतुक, मग असूया, पुढे अविश्वास व शेवटी काहीतरी लपवतोय हे भाव पाहीलेत. मी जितकं बोललो तितकं त्याच्या उलटं लोक समजायला लागले. माझी प्रगती, माझा पैसा, माझी decisions, सगळ्यांकडे संशयाने बघायला लागले. हळुहळू या सर्वांपलीकडे जाण्यासाठी बोलणं कमी झालं, हास्य वाढलं. शेकहॅंडनंतर ’excuse me’ म्हणून दूर सटकणं आपसूक यायला लागलं. professional life चा मुखवटा वापरून personal life वेगळं झालं. तरीही एकदा बोलावसं वाटलं. पण मला नाही तर अपेक्षाला. तेव्हा तिच्यासाठी ही दिलखुलास मोकळी पार्टी.आज बोलेल ती. ऎका तुम्ही. ऎकल्यानंतर ठरवा तुम्हीच काय ते!"

नाजूक हातांनी पदर सावरीत अपेक्षा सर्वांसमोर बोलायला उभी राहीली. काजळ लावलेल्या काळ्या नजरा पांढर्या डोळ्यांनी तिला बघू लागल्या. एकडे मिशीत लपलेल्या कुतूहलात कान टवकारले सर्वांचे!

"मी अपेक्षा!. नावच माझं अपेक्षा. मग मला छोट्या छोट्या बाबतीत अपेक्षा असणं हे काही चुकीचे नाही. लहान असल्यापासून पाहतेय लग्नं झालं परिचयातल्या कोणाचही की माझं नाव त्यांच्या प्रत्येक वागणूकीत दिसायचं. नवरा व्हायच्या आधी त्याला तिच्यातलं सौंदर्य दिसायचं. तिचा लोभसवाणा स्वभाव, सहवास हवाहवासा वाटायचा. तिला भेटण्यासाठी कुठलही निमित्तं तो ओढून ताणून आणायचा. तिचाही जीव सुखवायचा. तिलाही ते त्याचं रुंजी घालणं फ़ार फ़ार आवडायचं. हळुहळू त्या पाहण्यातून जेवणाची, मुलं झाल्यावर त्यांना नीट ठेवण्याची अपेक्षा दिसायची. तिचीही परिस्थिती काही वेगळी नसायची. काही बाहेर जायचं म्हंटलं की ्खर्च होणारे पैसे समोर दिसायचे. मुलांच्या भवितव्यासाठी "नको" शब्दानं ओठांवर ठाण मांडलेलं असायचं. काही विकत घेऊन वाचायचं, काही छंद जोपासायचा हे तर मुळी Dictionary तून गेलेलच असायचं.

नावे बदलली, वेळ काळ बदललेत, सांपत्तिक स्थिती बदलली पण परिस्थिती तीच होती. तेव्हाच मी एक निर्णय घेतला. जितके काही माझे परिचयातले होते, मित्रं होते, ओळखीचे होते,त्यांच्याबरोबर एक एक करून खडा टाकला. हो. पण त्याआधी मी चक्कं hypnotism शिकले. तेही लपून छपून पण पक्की शिकले.

प्रत्येकाला मी एकेकट्याला बोलावलं. माझी मोहक offer दिली. समज आपलं virtual लग्नं झालय. त्याची विकेटच उडायची. मग मी दर २० मिनीटांनी २-२ वर्षे त्यात add करायची. हिप्नॉटीझमच्या प्रभावाखाली त्याचा नवरा म्हणून role बघायची. प्रत्येकाने कल्पनेतला जो अनुभव दिला त्याचं नाव पळसाला पानं तीन. तीच गुर्मी, तीच अपेक्षा, नवरेपणाचे तेच ते हक्कं, स्वामित्वाची भावना! ते मला नको होतं असं नाही. पण त्यातलं मित्रत्वाचं व ममत्वाचं नातं केव्हाच गेलेलं होतं. ओलाव्याचा मागमूसही नव्हता.. hypnotism संपेपर्यंत मला ऊटीच्या थंड प्रदेशातून सहारा वाळवंटात गेल्याचा अनुभव यायचा.

मी हळुहळू निराश व्हायला लागले.. पण तरीही लळत लोंबकळत ईच्छाशक्तीवर मात करत रुटीन चालूच ठेवले.. आणि अचानक एका प्रवासात अनुराग भेटला. तोही रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्ये आणि दिवसा!. माझ्याशी तर बोलायलाही तयार नव्हता. त्याच्याच गुर्मीत. कामाच्या नशेत. पुस्तक वाचणं व लिहीणं. मोठ्या प्रयत्नांनी त्याला बोलतं केलं. नकळत सवयीने hypnotism वापरायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! जसजशी वर्षे पुढे जायला लागलीत त्याच्यात मित्रत्वाचे धुमारे जूनच फ़ुटायला लागलेत. कामाच्या व्यापाखाली दबून जाण्यापेक्षा माझ्याबरोबर मी म्हणेन तेव्हा यायला तयार! तेव्हाच विचार केला हाच तो!

Exactly २५ वर्षांचा प्रवास तेव्हा २५० मिनि्टांच्या सहवासात केला तोच आज पूर्ण झालाय. आणि हो, ज्या काही comments तुम्ही सर्वांनी केल्या आहेत, सीसी अनुरागपसून ते सायकोच्या उखाण्यापर्यंत, तेही मासलेवाईक नमूने मी डोळ्यांखालून व कानांवरून आधीच घातलेत. तेव्हा माझी निवड सार्थ केल्याबद्दल सर्वांचे आभार. ही पन्नास मिनिटांची कहाणी पंचवीस वर्षी सुफ़ळ संपूर्ण!"

पार्टी संपली ईतरांची पण अनुराग व अपेक्षाची पार्टी सुरुच आहे अजूनही. विश्वास बसत नसेल तरीही!

partी

Wednesday, April 29, 2009

होमवर्क आणि एक्सरसाईझ

शाळेत कोणताही धडा कितीही interesting असला तरी त्याची मजा लगेच निघून जायची त्यावरील exercises पूर्ण करताना! रिकाम्या जागा भरा, जोड्या जमवा, विरुध्दार्थी शब्द द्या, reference to context लिहा, थोडक्यात मुद्देसूद लिहा आणि काय काय तो अत्याचार! पण आता जर real life based धडा घेतला तर ह्याच exercises किती interesting होतील पहा. एक झलक !

रिकम्या जागा भरा :
१) आईने सांगितलेले काम स्वत:हून _________ करणार.(बाबा/ मुलगी/ कामवाली/ आईच)
२) दुपारी अचानक खाली पडून बशी फ़ुटली ती____________ मुळे! (वारा/ हलगर्जीपणा/ मांजरीचा धक्का)

जोड्या जमवा :

१) नवरा ----------------- परधार्जिणी
२)मुलगी-------------------असून अडचण नसून खोळंबा
३)कामवाली----------------कसा बाई यांना वेळ मिळतो चकाट्या पिटायला
४)नातेवाईक---------------सांगून रजा घेईल तर शपथ!
५)मित्र---------------------ठरवून येतील मदतीला तर नवल

Reference To Context लिहा:
a) या घरात माझं कुणी ऎकेल तो दिवस शेवटचा.
b)सांगून बाहेर जाणं ही पध्दत फ़क्तं आमच्या माहेरीच!
c) हा रंग मला खुलून दिसतो.
d) मी सांगितलं म्हणजे नाहीच ऎकणार.
e) मुलगा आहे, राज्याभिषेकाशिवायच सिंहासन चालवतोय.

थोडक्यात लिहा :
i) चोरून पाहीलेला सिनेमा
ii) वाचवलेले पैसे
iii) पहिला खोटारडेपणा
iv) दुसर्यांचा वेंधळेपणा
v) नसती उठाठेव
v) लष्करच्या भाकर्या

खालील प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद लिहा :
१)जर माझे तुझ्याशी लग्नं झाले नसते तर काय झाले असते?
२) मुलगा नक्की कोणाचे व किती चांगले(?) गुण घेऊन मोठा होतोय?
३) तुमच्या आईचे कुठे चुकले (किती वेळा व कोणत्या वेळेला)
४) तुझ्या वडिलांनी जर वेळीच मदत केली असती तर मी (कुठल्या) कुठे (म्हणजे नक्की कुठे?) पोचलो असतो?
५) माझं ऎकलं असतं तर किती फ़ायदा झाला असता.

शब्दांचा गुंतावळा

माणूस कशात गुंततो? एखादेच स्मितहास्य, वेगळे असे समर्पक वाक्य, नजरेच्या कप्प्यातून दिसणारी एक चोरटी झलक, ओझरताच होणारा हळवासा एक स्पर्श, टाळ्यांनी मिळालेला उत्फ़ूर्त प्रतिसाद, की डोळ्यातून ओसंडणारा स्निग्ध भाव, मुग्धाळलेल्या चेहर्याचा एक flash-back, अजून पुढे बोल ना सुचविणारे अविर्भाव, कशाकशाचे म्हणून नाव घ्यावे?
मजा अशी आहे की शब्दांचा गुंता करणारा त्यातून सरळपणे निघून जातो आरपार . आपल्या स्त्रीसुलभ हालचालींनी केशकलाप नीट करणारी मोहिनी नंतर केसांचा गुंता करून तो अलगद खिडकीतून बाहेर टाकणारी पण सहज होते नामानिरळी. पण नजरेत अडकून शब्दात फ़सणारेच फ़ार गुंता करतात आयुष्याचा! बरेच जण धारदार शब्दांची करवत अशी काही चालवतात की डोळ्यात पाहण्याचा व तदनंतर अडकण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तर काही अतिउत्साही डोळ्यांकडे किंवा डोळ्यांमध्ये न बघताच शब्दांचा दांडपट्टा असा काही चलवतात की त्यात अडकण्याचा कुठे मागमूसही नसतो. एकतर्फ़ी लिहीलेल्या प्रेमपत्रांमधून शाळा कॉलेजचे विद्यार्थी प्रेमाच्या नाही तर प्रिंसीपॉलच्या जाळ्यात अडकतात. लग्नानंतर "जबाबदारी घेतो" हे दोन शब्दं आयुष्यभर पेलावे लागतात.
कितीही कलंदर असला कलावंत तरी contract च्या शब्दांच्या चौकटीत अडकून प्रतिभा पणाला लावतोच. "शब्द दिला" म्हणून प्रेमात किंवा मैत्रीत नुकसान करून घेणारे नेहमीच बघत आलोय आपण पण मी त्याला शब्द द्यायला चुकले म्हणून हळहळणार्या व्यक्तिही कमी नाहीत या जगात.
निबंध म्हंटला की ५०० शब्दांच्या चौकटीत अडकायचो. कादंबरी म्हंटली की ५०० प्रिंटेड पानांच्या जंजाळात कादंबरीकार वर्षभर तरी अडकतोच.नाटकात किंवा सिनेमात अडकणारे नट आपण नेहमीच पाहतो पण dailogue लिहून देण्यासाठी आपापल्या खोलीत काम संपेपर्यंत अडकवून घेणारे dialogue writers या दुनियेत आहेतच.

कमी पडलेत शब्द तर कविता
जास्तं सुसंबध्द केलेत तर लेख
पसारा मांडला शब्दांचा तर दीर्घकथा
वाहवत गेला समुद्रासारखा तर कादंबरी!

शब्दच ते पण त्याची रुपे किती?
जिव्हारी लागला तर बाण
हसवलं तर डायलॉग
फ़सवल तर थाप
थिजवल तर शाप
चिंब भिजवलं तर भावनात्मक लेख
विचार करायला लावलं तर कोडं
लिहायला लावलं तर विचारांच झाड

लहान मुलांसाठी बडबड गीत
सासरी जाणार्या मुलीच्या आईसाठी डोळ्यांचे "डबडब " गीत
प्रेम सफ़ल जाले तर तरंगवणारे काव्य
प्रेम विव्हळ झालात तर गझल
प्रेम उगाळत राहिलात तर लैला मजनू

कॅलीग्राफ़ीतूनही खुणावणारे शब्दंच!
neon signs मधून लक्श वेधून घेणारेही असतात शब्दंच.
वक्तेही बोलणार असतात "दोन शब्दं"
दु:खात धीर देतात थोरा-मोठयांचे "चार शब्दं"
वादविवाद झाला तर वाढतो शब्दाने शब्द
पण तरीही शेवटी आपल्याला नि:शब्द करतात ते शब्दच!

गरम गरम

का असं नाही होत? जेव्हा आपल्याला भूक लगते तेव्हा आपण लगेच काहीतरी गरम गरम करून खातो तसं जेव्हा काही लिहायची भूक लागते तसं लगेच instant का नाही सुचत? विचारांची कढई तापलेली असते, पेनची शाई तेलाचं काम करते, कागदाच्या बेसनात भिजवून विचाराची भजी का नाही तळून घेता येत?

तसं तर आपल्या डोक्याच्या कपाटात कोणत्याही ईतर कपाटात नसतील ईतके जिन्नस अनुभवाच्या गाठोड्यांमध्ये साठवून ठेवले असतात. फ़क्तं गाठी सुटत नाहीत. वस्तू नीट ठेवलेल्या नसतात. जर वस्तू मिळाल्यात तर त्याला कॉमेंटस आणि टॉंन्टस ह्याची जी फ़ोडणी बोलताना मिळते ती लिहीताना मिळत नाही. समोरच्याची appreciative नजर आणि तिची लिंबू कोथिंबीर त्यावर पिळून मिळत नाही. हे सगळं मिळालं तर योग्य वेळेची डिश मिळत नाही. शिवाय वा! किंवा काहीतरीच असे चमचे पाहिजे खताना तेही जरा दुष्प्राप्यच असतात.

तरीही माणसं लिहीत असतात त्याला लोक शिळंपाकं समजून तोंडी लावतात, अर्धवट खाऊन ्फ़ेकून देतात. क्वचित आवडलं तर मनात ठेवतात आणि पुढला पदार्थ तितकाच चांगला झाला नाही तर नावं ठेवतात. शेवटी पोटाची भूक विचारांची भूक ही मणसाला नवीन नवीन पदार्थ करायलाच लावते. चुली वेगवेगळ्या पेटतात, तेल तूप ओतायचे थांबत नाही, डाळी बेसन, वाटून यायच्या थकत नाही, मग वेगवेगळ्या भाषांची कांद्याची भजी बरी बंद होतील?

Thursday, October 30, 2008

Posted by Picasa
एक झुरळ! ज्याला पाहताक्षणीच एकतर "ई" किंवा "त्याला ठेचा पायताणाखाली" हेच शब्दं कानी पडतात! पण हेच झुरळ जर दिमाखदार स्टेनलेस स्टीलच्या स्वरूपात, चकचकीत फ़िनीशमध्ये जर आपल्यासमोर कुणी आणून ठेवले तर?
तर तो एक object de art ठरतो. दिवाणखान्यात शोभून दिसतो. कुठून आणला ह्याची चौकशी करायला भाग पाडतो. नसेल पटत तर पुन्हा नीट पहा! दिसतेय काही ऊणीव त्याच्यात? मिळतोय काही दोष त्याच्यात ? नाही ना!
मग ह्या दिवाळीला ह्याचेच ग्रीटींग तुम्हा सर्वांना पाठवतोय.


आणि एकटा झुरळच का? अजून काही मासलेवाईक नमुने पाठवतोय. बगळा आहे, टोळ आहे





शहाम्रुग आहे




आणि चक्क एक फ़ुलांमधला रस पिणारा भुंगाही आहे. त्याचे पंख , त्याचा आणि अविर्भाव , सर्वच वेगळं आहे. असा भुंगा असेल तर फ़ुलालाही मजाच येईल.









हाच तो माशाचा डोळा जो अर्जुनाने भेदिला द्रौपदीसाठी!
दिवाळीच्या अनोख्या शुभेछ्छा!
हेमंत_सूरत




Posted by Picasa

Saturday, September 13, 2008

चेहरा

पायवाटेवरील धुळीत त्याच्या फ़ताड्या पायांची छाप पडून त्याचे अस्तित्व जमिनीला जाणवायचे. त्याच्या मागून येणार्यांना वार्याच्या झुळूकेतून त्याच्या घामाचा दर्पं यायचा. त्याच्या येण्याने व जाण्याने वाटेवरली कुत्री पडल्या पडल्या फ़क्तं डोळे किलकिले करून त्याचे अस्तित्व नोंदवायची. त्याच्या चेहर्यावरच्या रेषा कुणालाही कधी जाणवल्यात असे समोरच्याच्या डोळ्यांतून कधी झिरपले नाही. चालतानाची लकब कुणी मान वळवून बघावी अशी तर नव्हतीच नव्हती. कपडे घातलेले आहेत ते उपचार म्हणून! त्याच्या एकंदर अविर्भावावरून तो कशासाठी जातोय, कुणासाठी जातोय याचा कुणालाच थांगपत्ता लागत नव्हता.
विचार आपल्या मनात आपसूक येतात व येतच राहतात, जुने विचार मागे सरून पुढले विचार येतात त्या यंत्रवत परिपाठाप्रमाणे त्याची पावले पुढे पडत होती. पुढली झाडे मागे जात होती. दूरचे ठिपके मोठे होत होत त्याच्या सावलीत नाहिशी झालेत. पुढे उगवणारा सूर्य दिवसाचा क्रम आटोपून मागे सरत होता. त्याच्या पाठीला चिकटलेला उजेड हळुहळू निसटून अंधारात चाचपडत होता. त्याचे डोळे मात्र होते तेथेच होते. विचार होते तेथेच थांबले होते. नाही म्हणायला डोळे एकाच गोष्टीत खोलवर रूतले होते, अंधारात! त्या डोळ्यांना हेही जाणवले नाही की गावकोस ओलांडून भर संध्याकाळी तो एका घरासमोर यंत्रवत थांबला होता.
घर कसले ते! चार भिंतीत पाच कोनाडे ठेवलेले. दोन चुलींवर अर्धवट सरपण जळत पाण्यात टाकलेले मूठभर धान्य शिजायला कुरकूर करत होते. पोटाला भूक नसल्यागत घरचा धनी दरवाज्यात फ़तकल मारून बसला होता. मिणमिणत्या दिव्यात एक करपून गेलेली स्त्री होते नव्हते ते समोरच्या डब्यांमधून शोधून भांड्यात लावत होती.
घरच्या धन्यासमोरून हा वाटसरू आरपार निघून समोर जातोय तर न राहवून त्याला हटकले,"अहो पावणं, थांबा की जरा". पहिल्या हाकेत नाही पण तिसर्यात त्याने मान वळवली. क्षण दोन क्षण नीट थांबून पाहिले. तो ह्हरवलाय हे जणू तो त्याच्या डोळ्यातून हाक मारणार्याला सांगत होता. "अहो पावणं, मागं फ़िरा. बसा जरा घटकाभर. दोन घास खाऊन मग पुढे कुठं जायच तर जावा!"
आत्तापर्यंत फ़क्त शरीर चालत होतं तेही थांबल आणि मनाबरोबर स्थीर झालं. दोघेही एकमेकांसमोर बसलेत. घरच्या धन्याचं हळी मारणं, त्याच बसणं, हे घरातल्या स्त्रीच्या कानानं हेरलं होतं. आता तिच्या हालचालींना वेग आला. चुलीत दोन लाकडं जास्तं शिरलीत. फ़ुंकणीतून हवा अजून ओतली. भांड्यातल्या पाण्याला उकळी फ़ुटली. डाळ तांदूळ रटरट आवजात नाचू लागलेत. दिव्याची ज्योत मोठी झाली. घरातल्या वस्तूंना उजेडात आकार आला.
तीन थाळ्या जमिनीवर पसरल्यात. ऊनऊन भात व डाळ त्यावर विराजमान झाल्यात. बाहेरची मंडळी थाळ्यांसमोर आली. हात व तोंडाची गट्टी जमताच समोरची डाळ भात नाहीशी होऊ लागली. हळुहळू वाढण्याचा आवाज नाहीसा झाला. थाळ्या रिकाम्या झाल्यात. ढेकर देण्याच्या आवाजाने त्यावर शिक्कामोर्तब झालं. चूळ भरून हात धुतल्याच्या आवाजाने पावले दारापाशी येऊन थांबल्याची ग्वाही दिली. थोड्याच वेळात दाराजवळ सहा पावले येऊन बसलीत. दिव्याच्या अंधूक होत चाललेल्या प्रकाशात तिघांचेही चेहरे त्रुप्तं जाणवत होते. त्यातल्या एका चेहर्याचे ओठ हललेत व काही शब्दं हवेत फ़िरू लागलेत. दुसरीकडून हलकासा प्रतिसाद येऊ लागला. जेवण देणारी ती स्त्री अजूनही फ़क्तं कानांचाच वापर करीत होती. त्या दोघांच्या बोलण्यातून तिने ताडले की येणारी व्यक्ती चित्रं काढते. चित्रांच्या शोधात तो माणसे शोधू लागला.
माणसांच्या चेहर्यात त्याला माणसे दिसेनात. जितकी जास्तं माणसे त्याने पाहिलीत, तितकी ती त्याला चेहर्यांपासून दूर वाटली. त्यांना सुरकुत्या नव्हत्या तर अपेक्षांचं जाळं होतं. डोळे नव्हतेच, त्या जागी तर अत्रुप्त ईच्छांच वारूळ होतं. नाकाच्या जागी समोरच्या व्यक्तीच्या स्वार्थाचा दर्प येत होता. हसण्यातून फ़सवेपणा जाणवत होता. कान फ़क्त आणि फ़क्त स्तुतीसाठीच हपापलेले होते. केसांच्या जागी खुजं कर्त्रुत्व (?) झळकत होतं. गळा तर सगळा भूतकाळाच्या आठवणीत रूतला होता. डोकं निव्वळ खोटेपणाने भरलं होतं. चेहरा मुळी त्याला दिसलाच नव्हता. चेहरा नाही म्हणून चित्र नाही. चेहर्यासाठी तो वणवण भटकत होता.
त्याची व्यथा जाणवताच घरातल्या स्त्री-पुरुषामध्ये समाधान पसरले. हो, होता आमच्या घरात एक चेहरा! तू म्हणतोस तसा. निरागसतेचा चेहरा, स्वार्थापासून दूर, आशेच्या जवळचा व प्रेमाला हपापलेला. पण तोही काही वर्षांपूर्वी आमच्यापासून दूर गेला, तोही कायमचा! आमचा एकुलता एक मुलगा.
त्या दिव्याच्या इवल्याशा प्रकाशात त्या माऊलीने घरातली एक छोटीशी पेटी ओढली. त्यातले एका किशोरवयीन मुलाचे कपडे बाहेर काढलेत. त्याच्यासाठी वापरात असलेला कंगवा, काजळाची डबी, तो खेळत असलेले काचांचे तुकडे, धातुच्या रिंगा, सर्व काही त्या चित्रकारासमोर ओतले. हळुहळू ते आई-बाप मुलाच्या आठवणीत रमलेत व दु:खाच्या सुखात न्हात निद्राधीन झालेत. थिजलेला तो चित्रकार वाटसरू दरवाज्याशीच अंग आडवं टाकून झोपेला शरण गेला पण मनाशी काहीतरी निर्धार करून!
सकाळी लख्खं उजाडलं तेव्हाच घरातल्या मालक मालकिणिने आळस देत, शांत झोप घेतल्याची ग्वाही देत आजूबाजूला पाहिलं तर तो पाहुणा दारापाशी नव्हता. त्यांनी लगबगीने दाराबाहेर येऊन पाहिले तर -
रांगोळी, काचा, कवड्या, काजळ, रिंगा व रंगीत चिंध्यांचे मिळून एक अमर चित्र तयार झालं होतं त्या मुलाचं! त्याला डोळे होते, नाक होतं,ओठात हसू भरलं होतं आणि आईवडिलांसाठी असलेला अमाप करुणेचा एक चेहरा पण होता!

Sunday, April 13, 2008

कवि अनिल

मित्रहो, कवि अनिल ह्यांच्या काही दशपदी माझ्याकडे आहेत. त्यातील काही पाठवतोय. त्यांची CD पण आहे. ती ऎकताना वेगळीच अनुभूती होते. मी माझ्या काही मित्रांना CD पाठवणार आहे gift म्हणून. ज्यांना वेगळी CD हवी आहे त्यांनी ह्या पत्त्यावर संपर्क करावा. अर्थात हा काही publicity stunt नाहीय. फ़क्त बर्याच वेळेस असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट हवी असते पण कशी व कुठून घ्यावी हे माहीत नसते म्हणून ही सोय केली आहे.

सौ. आशावती देशपांडे, 88, west park road, Dhantoli Nagpur - 440012
एका CD ची किंमत आहे रुपये शंभर . पोस्टेज वेगळे. D.D. १०० रु.ची "सौ. आशावती देशपांडे " ह्या नावाने पाठविणे.
e-mail : deshpande.nagpur@gmail.com


तुझ्याविना

कितीक काळ हालला
असा - तुझ्याविना
कळे न श्वास चालला
कसा तुझ्याविना

दहिवरल्या प्रहरातून वाट
पाहते पहाट
बहर गळे दरवळला
कसा तुझ्याविना

लवथवत्या पानावर गहिवरते
भरदुपार
ज्वरभरला दिवस ढळे
कसा तुझ्याविना

तमामधुन सावकाश उजळे
आकाश निळे
चळे उदास चंद्रमा
कसा तुझ्याविना

तार्यांचा धरून भार रात्रिस
उरते न त्राण
स्मरणावर प्राण जळे
कसा तुझ्याविना


स्वप्नबीज

थोडी जाग थोडी नीज
अधांतरी स्वप्नांचे बीज
काही द्न्यात काही भ्रांत
किंचित व्याकुळ
किंचित शांत

थोडी बाहेर थोडी आत
किंचित पहाट किंचित रात
थोडी ऊब थोडे गार
केव्हा स्मित केव्हा सुस्कार
काही धीट काही भीत
थोडी हार थोडी जीत

अंमळ रुसवा अंमळ प्रीत
काही गुणगुण काही गीत
थोडी जाग थोडी नीज
अधांतरी स्वप्नांचे बीज

Friday, April 11, 2008

कवि अनिल

कवि अनिल

अचानक धनलाभ तसा कधीकधी अचानक celebrity लाभ होतो. मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाण्याचा मुहूर्त साधला. सूरजकुंड्च्या आलीशान हॉटेल मध्ये रहाण्याची व्यवस्था. प्रशस्त रूम्स. रूम्सच्या मधोमध तळे त्याबाजूला पेंडॉल. रोषणाईची जय्यत तयारी एका बाजूला चालू. मला फ़िकीर मी कोणत्या रूममध्ये आणि माझ्याबरोबर कोणती व्यक्ती येणार? नागपूरच्या माझ्या मित्रांपैकी की कोणि अनोळखी? मग गप्पा कोणाबरोबर मारणार?
मित्राने सांगितले तू काळजी करू नको. आत्ता इकडे तिकडे फ़ीर. संध्याकाळी सांगतो कोण आहे तुझ्याबरोबर. दिवस फ़िरण्यात घालवला. थोडे trinkets घेतले. रात्रीच्या जेवणाआधी मेसेज मिळाला देशपांडे सर तुझ्याबरोबर आहेत. मी आनंदाने उडालोच. म्हणजे कवि"अनिलांचे" चिरंजीव? हो पण त्याचे काय? त्यांची identity तर department of architecture चे head ही होती. अतिशय प्रोफ़ेशनल approach. disciplined व्यक्ती. सगळ्यांना त्यांच्याबद्दल नितांत आदर. architecture चे subjects शिकवावे ते त्यांनीच. खूप काही बोलायचे मनात साठवून मध्यरात्री शिरलो function आटोपून रूममध्ये तर नशिबाने ते जागेच होते.

"सर, मी आज जरी प्रोफ़ेसर असलो तरी बहात्तर ते सत्त्याहत्तर तुम्हाला हेड म्हणून पाहीलेय. तुमच्याशी तेव्हापासूनच बोलायची ईच्छा होती पण शक्य झाले नाही. आज विचारायची ईच्छा आहे की मला तुम्ही कवि "अनिलांचे" चिरंजीव म्हणून सांगा की कवि अनिल केव्हा आणि कशा कविता लिहायचेत?"
"मला खरं तर हे आवडलं की तुम्ही ईतरांप्रमाणे हे नाही विचारले की मी का कवि नाही झालो. माझे बाबा सारखे फ़िरतीवर असायचे खास करून नागपूर ते दिल्ली या रूटवर. त्यांची फ़र्स्टक्लास कोचअमध्ये वरचा बर्थवरची जागा रिझर्व केलेली असायची. रात्री बसलेत बर्थवर की मग कविता लिहायला सुरूवात व्हायची. त्यांच्या बर्याचशा कविता ह्या वरच्या बर्थवरच्याच आहेत. पण success rate 50%. कारण अर्ध्या तरी वेळेस त्यांना ओळखणारा कोणि तरी भेटायचाच. मग कसल्या कविता अन कसलं काय. गप्पांमध्येच वेळ निघून जायचा. पण घरी आल्यावर माझी आई त्यांना विचारायची," किती कविता केल्यात?". मग केली असेल तर कवितावाचन व्हायचे. त्यात करेक्शन्स, मॉडिफ़िकेशन्स वगैरे सोपस्कार होऊन ती पूर्णत्वाला यायची. खासकरून दशपदी हा प्रकार त्यांनी ट्रेनमध्येच जास्तं लिहीला?"

"दशपदीची एखादी खास आठवण?"
"हो. त्यांची शेवटची दशपदी ही नेमकी नऊ ओळिंची होती. त्ती पूर्ण करण्यासाठी तमाम रसिकांना आवाहन केलं. खूप जणांनी response दिला. पण मनासारखी पूर्तता होत नव्हती. शेवटी मान्यवर विजया राजाध्यक्ष यांनी नोट केले की नऊ ओळींमधली शेवटची ओळ मुळी दहावी ओळ होती व नववी ओळ missing होती. त्यानंतर काम सोपे झाले. माझ्या वडिलांना दशपदीत शेवटची ओळ आधी लिहून मग नववी ओळ लिहायची सवय होती. "

"ते हातांनी लिहायचे की typewriter वर लिहायचे घरी?"
" हातांची व खास करून बोटांची एक गंमत आहे. आप्ल्या बोटांची टोके ही फ़ार sensitive असतात. डोक्याशी जर त्यांचे जमले तर बोटेच लिहीतात असे वाटते. पण त्यासाठी डोके, विचार व लेखणी ह्यांचे synchronization व्हायला हवे."
" हा त्याबद्दल परवाच्याच एका संगीत सरिता कार्यक्रमाची आठवन आली. त्यात एका संगीत तद्न्याने सांगितले की प्रथम आम्ही वाजवतो मग विचार करतो की काय वाजवतोय. मग आम्ही विचार करतो की काय वाजवायचे आहे आणि मग दुसर्या stage मध्ये त्याप्रमाणे वाजवतू. पण खरी कसोटी असते ती तिसर्या stage ची की तेव्हा आम्ही बोटांनी वाजवतो विचार आणि वाजवणे एक्साथ होतं. ती खरी परमानंदी टाळी!"

गप्पांमध्ये घड्याळ मध्यरात्रीचे किती वाजलेले दखवतंय इकडे दुर्लक्ष झाले आणि शेवटी एक CD gift मिळाली कवि अनिलांच्या दशपदींची !
सूरतला आल्यावर ऎकताना ब्रह्मानंदी टाळी लागली आणि अर्थापलीकडचे अर्थ एक एक करून पाझरू लागले. बोल होते :

कितीक काळ हालला असा तुझ्याविना
कळॆ न श्वास चालला तुझ्याविना

दुसरी दशपदी :

थोडी जाग थोडी नीज
अधांतरी स्वप्नांचे बीज

पंखी खुपसून चोच
एक पक्षी निजलेला

शिरा

नागपूरकडची एक (वेंधळी) देशस्थ फ़ॅमिली. स्थळ किचन. वेळ (नेहमीचीच) घाईची. दोन व्यक्तिंना तीन ठिकाणी जायचेय कारण एकाला उशिर झालाय नेहमीप्रमाणे.

" अरे देवा जाताना साखर खाऊन जा. समोरच्या डब्यात आहे वरच्या फ़ळीवर. खायचं नाव घेतलं आहे तर साखर तरी खाऊन जा,"
"कशाला नाट लावतेस. मला ब्रेडच हवी. ए सुमा, तो तवा काढ. मी वरनं तूप काढते ब्रेडसाठी."
" हे काय, तव्यावर ब्रेडऎवजी साखरेच्याजागी हे कसलं पीठ ओतलय? त्या धांदरट दिलप्याचाच काम असणार हे. "
" हे बघ ते जळतय पीठ का काय ते. आता ह्या दिलीपला फ़ोनवर आत्ताच बोलायचं काही अडलं होतं का? "
"आई, तूप वरून काढताना थोडं सांडल बघ. काही तव्यावर, काही जमीनीवर."
"थोडं काय गधडे, तो तवा भरला बघ तूपाने. आता काय करणार त्याचं?"
"ओत ते भाजलेलं पीठ ह्या परातीत."
"मी वेगळी काढून ठेवलेली पीठी साखर कोणि ढापली? ह्या परातीत ठेवली होती."
"हे त्या शालूचच डोकं असणार. पहायचं नाही काही नाही अन टाक म्हंटलं तर टाकायच परातीत. आता ती साखर विरघळली असणार त्या पीठात"
" अरे कोणितरी मीरी म्हणून वेलची कुटून ठेवलीय ह्या डबीत. हा बघ हा अजय खेळतोय त्या डबीशी मघापासून. दे रे ती डबी. काढलं बाई झाकण ह्या गुलामाने. अरे अरे काय करतोस हे. ती वेलची पूड फ़ेकली त्याने त्या पीठात."

" हे घर आहे की बाजार. ब्रेड दिसत नाहीय, तूप सांडलय, साखर लपलीय आणि आता वेलची पूडही नासवलीन. ओत हे सगळं त्या दिलप्याच्या घशात आणि जा म्हणाव interview ला."
"या अजयकडे बघ. तोंडात बोकणा भर्लेला दिसतोय कसलातरी. आणि हसतोय लबाड."
"आई, हा अजय बघ, तोंडात बोट नाही घालू देत मला काय खातोय ते काढायसाठी. हे बघ अजून एक लपका हाणला त्याने परातीतला."
" बघू मला त्याने काय खाल्लंय ते. नाहीतर पोट बिघडेल त्याचे. अरे वा!. हे तर फ़र्मासच झालय. उगाच नाही ह्या नखरेल कार्ट्याची खुषी दिसतेय ती. तू पण बघ एक घास खाऊन."
" आई ह्याला काय म्हणायच?"
" हा सगळ्यांच्या पोटात सहज शिरतो आणि आवडीने तेथे राहतो म्हणून ह्याचे नाव ठेवू या आपण "शिरा".

तर अशा रितीने देशस्थांनी शिर्याचा शोध लावला.
पण patent मात्र कोकणस्थांनी घेतले आणि धूम फ़ायदा केला देशाचा.
(सर्व देशस्थं आणि कोकणस्थांची क्षमा मागून. हो नाहीतर कोणी माझ्यावर दावा ठोकायचा.)

Saturday, March 29, 2008

बडबड गोष्टी

बडबड गोष्टी
बडबडगीते असतात तशा ह्या बडबडगोष्टी! छोट्यांच्या तशाच मोठ्यांच्याही आवडीच्या! हां आता तुम्ही मोठे नसाल तर तुम्हाला नाही आवडणार ही गोष्टं वेगळी. छोटे असाल तर अजून सांगा म्हणणार. तर काय मग तुम्ही छोटे़च व्हा. मोठ्यांच काही ऎकू नका.
स्वर्गात ईंद्राचा दरबार भरला आहे. सभा तुडुंब भरली आहे ती सर्वं प्रकारच्या प्राण्यांनी. कैफ़ियत मांडताहेत ते प्राणी आणि ऎकताहेत ते पण प्राणीच. देव फ़क्त निवाडा करण्यासाठी बसलेत ते शेवटचा निवाडा करण्यासाठी. मध्ये ते काहीच बोलणार नाहीत. हो, एक माणूस(प्राणी) पण आहे त्यामध्ये जर आपल्या पोळीवर तूप ओतून घेता येईल का या विवंचनेत ऊभा असलेला एका कोपर्यात. ऎकतोय डोळ्यांनी अन पाहतोय कानांनी.
प्रश्न आहे तो प्राण्यांमध्ये. एका बाजूला तक्रार करताहेत ते प्राणी आहेत ससा, गाय, हरीण, जिराफ़, बकरी आणि दुसर्या बाजूला ऊभे आहेत ते वाघ, सिंह, लांडगा, बिबट्या,अस्वल वगैरे! दोन बाजूंमध्ये फ़रक आहे तो जीवन-मरणाचा. अक्षरश:! कारण पहिल्या बाजूचे ससा, गाय, बकरी वगैरे प्रुथ्वीवरून मेल्यानंतर स्वर्गात आलेले आहेत तर वाघ, सिंह, अस्वल हे खास देवांनी बोलवल्यामुळे जिवंतपणीच स्वर्गात आले आहेत. तक्रार आहे ती ह्याप्रमाणे -
ससा - मी चांगला गवत खात होतो जवळच्या कुरणात तर हा लांडगा मला कानात काहीतरी सांगतोय म्हणाला असं वाटल्यामुळे मी मान त्याच्या तोंडाजवळ नेली तर ह्याने माझे कानच खाल्लेत. आता ह्याला काही गरज होती का असं काही करण्याची? तूही तर कुरणाच्या दुसर्या बाजूने गवत खात खात तर येत होता ना.
लांडगा - मला शिकवू नकोस गवत खात होतो म्हणून. मी पाहीलं तर तू चक्क गवत खाता खाता एक तुरु तुरु धावणारा कोळी मटकावलास. लगेचच दुसरा कोळी मला तुझ्या कानावर दिसला म्हणून मी तो मटकावला तर तुझा कान नाजूक. लगेच तुटून माझ्या तोंडात आला.
ससा - ठीक आहे. पण मग माझ्या मानगुटीत दात रोवून का मारलस मला? आपलं ठरलं होतं ना की जरी आपण लहान मोठे असलोत तरी पोट भरलं असेल तर उगाचच दुसर्याला मारायचं नाही. एवढा वेळ तर तू गवत खात होतास?
लांडगा - आता तुझ्या आरस्पानी गळ्यातून जाणारे गवत मला दिसत होते. वर तो कोळी मला वेलची टाकल्यासारखा दिसत होता. मग मला राहवले नाही. तुझ्या गळ्यातले गवत खाण्यासाठी मी फ़क्तं दात रोवले व जिभेने माझ्या गळ्यात ओढून घेतले. आता त्यात तुझा जीव गेला तर मी काय करू?
तेवढ्यात ईतका वेळ मागे चुपचाप असलेली गाय वाघिणिकडे रोखून ओरडायला लागली. "ह्या लांडग्यामुळेच मी हकनाक जिवाला मुकली. मला माहीती आहे सशाला खाताना ह्या वाघिणिने नक्कीच ऊंच कड्यावरून पाहीलं असणार. कारण अगदी कालपर्यंत तर ही वाघीण तिच्या मुलांसाठी गवताचे भारे एकावर एक उचलून आणत होती. मग आजच माझ्याबरोबर गवत खाण्याचे निमित्त करून मला अचानक पाडून माझ्या वासराची पण का हत्त्या केली?
यावर वाघीण काही कमी नव्हती. तिने लगेच गायीला पकडले." हे बघ तू जर निव्वळ गवत खात होतीस तर मग तुझ्या पायाखालून जाणारे तीन ऊंदीर एकदम कसे नाहीसे झालेत? शिवाय त्याआधीचे दोन सरडे, एक पाल आणि एक बेडूक तू दाताखाली टाकलेस ते काय गवत म्हणून? तू जर हे सर्व करू शकतेस तर मला पण तुझ्या हातापायाचं धिरडं करून खाता येऊ शकत. जे प्राणी जिभेवर बेडूक ठेवू शकतात, ते दुसर्यांच्या गळ्यात व पोटात मुक्काम ठेवू शकतात!
या सगळ्यावर कहर म्हणून जिराफ़ मध्येच केकाटला," ह्या बिबळ्याला आवरा. माझ्याबरोबर झाडावर चढून पाला खाता खाता मला म्हणाला तुझ्या मानेला काट्यामुळे जखम झालीय, जरा चाटून पुसून देतो, म्हणजे सेप्टिक होणार नाही. मी मान वाकडी केली तर माझ तोंड मला माझ्या पायावर दिसलं आणि मान ह्याच्या तोंडात. शोभत का हे पोटभर पाला खाऊन ढेकर दिल्यानंतर?"
बिबट्या - हे बघ पोट भरल्याच्या गोष्टी माझ्यासमोर नको करूस. तूही पाला ओरबाडता ओरबाडता झाडावरच्या ओळीने चालणार्या मुंग्यांचा फ़डशा पाडत होतास. तू जर मुंग्या खाऊ शकतो, तर मी मुंग्याचे वारूळ तुझ्या मानेत आहे असे समजून ते ढापू शकतो.
हे एवढं झाल्यावर तर माकडालाही रहवलं नाही. तो आवेशाने म्हणाला," सगळ्यात वाईट अस्वल. माझ्या छोट्यांना हसवत हसवत फ़ळांच्या झाडाखाली घेऊन गेला, आपण फ़ळे खाऊ सांगून. आणि थोड्या वेळाने पाहतो तर काय, माझ्याच मुलांची फ़ळे खात होता."
अस्वल - हे पहा , आपण प्राणी आहोत, माणसं नाहीत. आपण प्राणी जे काही करतो ते फ़ळांची अपेक्षा ठेवूनच करतो. माणसांना खुशाल म्हणू दे, कर्म करा फ़ळाची अपेक्षा ठेवू नका. मी जे काही करणार त्यात फ़ळ खाणार हे आलेच. तुझी बाळं ही तुझ्या संसाराला आलेली फ़ळच आहेत ना? मग कशाला अकांडतांडव करतोस?
यावर कोल्हा, हत्ती, झेब्रा हे सर्व देवाकडे बघून एकसुरात विनवणी करायला लागलेत की देवा वाचव आम्हाला या हिंस्त्र श्वापदांपासून. आम्ही आता जरासुध्धा बाहेर जाऊ शकत नाही. बाहेर पडलो तर सिंह, वाघ, लांडगा आम्हाला खाणार. नाही बाहेर पडलो तर उपाशीपोटी हाल हाल होऊन मरणार. आम्हाला काय हे प्राणी असेही खाणार नाही तर तसेही खाणार.
हे ऎकताच देवांची ट्युब पेटली आणि त्यांनी लगेच निवाडा द्यायला सुरुवात केली याप्रमाणे.
"यापुढे ससा, गाय, झेब्रा, हरीण, जिराफ़, माकड हे आणि ईतर यांच्यासारखे सर्व फ़क्त गवत, पाला व फ़ळे खातील. हे खाऊन ते लठ्ठं झालेत की नंतरच मग त्यांना वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल वगैरे हिंस्त्र प्राणी त्यांचा फ़डशा पाडू शकतील. यापुढे वाघ, सिंहांना गवत पाला वगैरे अजिबात आवडणार नाही व ते खाणार्या प्राण्यांना "घास-फूस" म्हणून चिडविल्या जाईल. वाघ- सिंहांना नखे, सुळे व मऊ पंजाची गिफ़्ट देण्यात येईल कारण त्यामुळेच ते नीट शिकार करू शकतील. हत्तींना मात्र अभय राहील. फ़ारच कमी पक्षी यात involved नसल्यामुळे त्यांना उंदीर, कोळी, सरडे वगईरे खाण्याची परवानगी मिळेल. काही पक्ष्यांना पाण्यात बुडी मारून मासे खाण्याचा बोनस मिळेल. पण या सर्व प्रकारात मासे चतुराईने ईतरांना उगाचच जमीनीवर येऊन खात असल्याचे आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही त्यांना हा शाप देतो की मासेच माशांना खातील. "
ईतका वेळ बाजुला राहीलेला माणूस पुढे येऊन बोलला,"देवा, माझं काय?"
देव उत्तरलेत," तुला सर्वं काही खाण्याची परवानगी राहील. मात्र तू तुझ्या बुध्धीचा उपयोग करून, तुझ्या सद्सद्विवेकबुध्धीला पटले तर तूच प्राण्यांना मारण्याची यंत्रे शोधून काढून मारशील आणि खाशील."
यानंतरच शाकाहारी, मांसाहारी, पाळीव आणि हिंस्त्र श्वापदे अशा categories निर्माण झाल्यात.
हेमंत_सूरत