Friday, September 15, 2006

सूरती फ़रसाण - २

सूरतला आल्यावर आम्ही वाट बघत होतो प्रथम कोण येतं आमच्याकडे. नवीन क्वार्टर, नवीन जॉब, नवीन शहर, सगळंकाही शेअर करायचं होतं. अपेक्षित नसताना एक पोस्ट-कार्ड दर्वाज्याखालून सरकलं. गोविंद पाचपोर येणार होता केव्हातरी येत्या पंधरवड्यात. खास टीप होती, कोणालाही कळवू नये येण्याबद्दल. काय गौडबंगाल आहे हे कळेना. शेवटी आल्यावर कळेलच तेव्हा speculation चा नाद सोडला.
एके दिवशी संध्याकाळी डोअरबेल वाजली. स्वारी गोविंदची होती. surprise of surprises म्हणजे सोबत एक देखणा चेहरा होता.
"अरे, love marriage आटोपून आलोय."
"मग ये की. आत बस. पाणी घे. त्यानंतर सांग सविस्तर."
"अगं सोनल, बस. हेमंत आपलाच आहे. "
"मी आत जाते. चहा ठेवते सर्वांसाठी. तुम्ही बोला निवांत."
"सापडेल का चहा साखरेचं?"
"नवरा मिळवला गोविंदसारखा आणि तोही त्याच्या आईच्या नजरेखालून पळवून तर चहा-साखरेच्या डब्याची काय बात?" सोनल आत गेली.
" पण गोविंद, मला तर तू तिला पळवून आणलंय असं वाटतय."
" हो. मीच पळवून आणलय तिला"
"मला एक सांग. लग्नं करणारे प्रेमी जीव, लग्नानंतर ऊटी, मथेरान, माऊंट अबू येथे जातात. तू जरा अरसिकच दिसतोय. माझ्यासारख्या ब्रह्मचार्याच्या मठीत तेही सूरतसारख्या dry (सर्वार्थाने) शहरात तू तुझ्या बायकोला आणलेय. काय कारण तरी काही आहे नाहीतर ती बिचारी आयुष्यभर तुला सुनावत राहील मला सूरतला नेले, मला सूरतला नेले. जगातली सगळी रमणीय स्थळे नाहीशी झाली होती माझ्या honeymoon च्या वेळेस."
तेवढ्यात चहा घेऊन सोनल आली,"नाही हं. मी काही म्हणणार नाही. माझा नवरा चांगला डोकेबाज आहे सूरतची निवड करण्यात. ऎका त्याच्या तोंडून."
लगेच गोविंदचा धबधबा सुरू झाला.
" अरे, मी हिला कॉलेजमधून मैत्रिणीकरवी निरोप देऊन वर्ध्याला नेले. तेथे भटजी तयार होता. चार मित्रं साक्षीदार होतेच. सात फ़ेरे घेवून तासाभरात नवजीवन express मध्ये बसून सूरतकडे कूच केले. ह्या सगळ्यामागे एकच हेतू. मी वर्ध्याला जाऊन लग्नं करणार हे कोणी स्वप्नातही ओळखणार नाही. त्यानंतर तू म्हंटल्याप्रमाणे, हिच्या घरचे, माझ्या घरचे hill station, goa वगैरे ठिकाणी शोध घेतील. सूरतला अम्ही राहू ह्याचाही कोणी विचार करू शकणार नाही. सोनलचे भाऊ जरा भडक डोक्याचे. कुर्हाड हाणायलाही कमी करणार नाहीत माझ्या डोक्यात. आम्ही दोघेही जातीबाहेर जाऊन लग्नं केल्यामुळे दोघांच्याही घरी आगी लावून आलो आहोत. शिवाय दूसरे असे की तू academic institute च्या campus मध्ये. by law, पोलीसांना तुझ्या principal च्या परवानगीशिवाय मला हात लावता येणार नाही. मी तुझ्या मठीत सुरक्षित आहे. राहिली गोष्टं तुझ्या अडसराची. तर तू माझ्या नावाने institute guest house book केलेच आहे तर तूच तेथे रात्री रहा. सगळं काही स्थिरस्थावर होईपर्यंत आम्ही quarter ला राहू. आता काही अडचण?"
मी गोविंदला साष्टांग प्रणिपात घालायचाच तो काय बाकी होता.
३ दिवसांनंतर, honeymoon couple चे चेहरे ऊजळलेले दिसत होते.
" नागपूरहून फ़ोन आलाय मित्रांचा. आमचे सामान जे आई-बाबांनी बाहेर अंगणात फ़ेकले होते ते परत घेतले. सोनलच्या भावांनी कुर्हाडी भिंतीवर टांगून ठेवल्यात. आता आमचा खरा honeymoon सुरू. आम्ही चाललो mount abu ला. परत आल्यावर भेटू"
त्या ३-४ दिवसात जे माझ्यासारख्या ब्रह्मचार्याचे जे लाड झाले खाण्यापिण्याचे सोनल वहिनींकडून ते मी कधीच विसरू शकणार नाही. अतिशय जड अंत:करणाने मी त्यांना निरोप दिला. आताही मी जेव्हा जेव्हा गोविंदकडे नागपूरला जातो तेव्हा तेव्हा माझी खास बडदास्त ठेवली जाते. एक संध्याकाळ गोविंद-सोनल कडे ठरलेलीच. माझे लग्नं झाल्यानंतर त्यात स्वातीची भर पडली एका जास्तीच्या ताटाची.

3 comments:

Anonymous said...

Wachun kharach maja aali. khari goshta aahe ka??

hemant_surat said...

हो. गोष्टं खरी आहे. नाव बदललेय मित्राचे. बाकी सर्वं तंतोतंत खरे आहे.
हेमंत_सूरत

Anonymous said...

ha ha ha, dhamal aathavan, vaachun ha ha lo po.