Monday, February 11, 2008

सिनेमाचे दिवस

काहीच जमत नसले की जुने आठवावे. त्यातही जुन्या आठवणी हव्या असतील तर आपण स्वत: पाहीलेले सिनेमे आठवावेत. मन तरल होत. (ट्युलिपचा सल्ला!) डोळ्यांसमोर सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी येतात. रोजचे प्रॉब्लेम्स, तेच ते फ़र्निचर, सिंकमध्ये पडलेली चहाची भांडी, सगळं काही अलगद नाहीसं होत. नाही खरं वाटत? पहाच मग तर!
वयाच्या नवव्या वर्षी पाहीलेला "मेरे मेहबूब". तो लक्षात राहतो तो त्यातील हार्मोनियम,तरल पडदे, काळे बुरखे, जुने rich कलाकुसरीचे फ़र्निचरचे नमुने यामुळे. हो रडतोय की गातोय असा प्रश्न पाडणारा राजेंद्रकुमारही आठवतो. पण त्याहीपेक्षा appeal झालं होतं ते प्रशस्तं घर. घर कसं असावं तर त्यात दोन नायिकांना मोकळेपणाने dance करता आला पाहिजे हे civil engineering च्या planning मध्ये कुठेही नं बसणारे principle पटले होते. "मेरे मेहबूब मे क्या नही" ही फ़ॅंटसी तेव्हाही मनाला सुखावून गेली आणि आत्ताही ! फ़क्तं एक बायको मोठ्या मुश्किलीने मिळते तेथे दोन dance करणार्या तिलोत्तमा कुठून गळ्यात पडणार आहेत, तेही लग्नाआधी, हा विचार तेव्हा कधीच रसभंग करून गेला नाही. तसंच कॉलेज म्हणजे फ़क्तं सुंदर मुलीला धडक मारण्यासाठी, पुस्तके ही खाली पडण्यासाठी, व प्रत्येक बुरख्यातली स्त्री ही साधनाऎतकीच सुंदर असणार ही ठाम पटलेली खात्री बरीच वर्षे (कॉलेजमध्ये स्वत: जाईपर्यंत) मनातून निघाली नव्हती.

हे सर्वं पडद्यावर बघण्यासाठी दीड तास पायी चालत जाणे व सिनेमानंतर तीच पदयात्रा करणे , तेही अकोटच्या forest officer च्या डाकबंगल्यापर्यंत, सोबतच्या दीड डझन नातेवाईकांबरोबर, ह्याचं काहीच विषेश वाटत नव्हतं. तेव्हा सिनेमाची मोहीम सर करणे ही एडमंड हिलरीच्या एव्हरेस्ट मोहीमेईतकीच महत्वाची असायची. थिएटर काबिज करणे, तिकीट मिळविणे, खुर्चीत जागा पकडणे, हे सर्वं एव्हरेस्ट मोहीमेईतकेच thrilling होते. (आता एव्हरेस्ट किती वेळा सर केले ते विचारू नका.)

तसच खरा दोस्त हा नेहमी लंगडा किंवा आंधळा असायला हवा ही समजूत "दोस्ती" सिनेमाने करून दिली होती. त्याला निदान mouth organ तरी वाजवता यायला पाहीजे हेही मनावर घट्टं बसलं होतं. त्यामुळे तेव्हाचे सर्वं मित्रं अचानक साधे वाटायला लागले होते. तिसर्या ईयत्तेतले ते सर्वं मित्रं आज हयात असूनही दुरावलेले आहेत पण खर्या मित्राची ती definition बरेच दिवस मनात पक्की होती.

तसंच त्यावेळेस हॉस्पिटल मधल्या नर्सेस साठी गाणी गाण्याचा compulsory सब्जेक्ट असावा हेही मनात खोलवर रुतले होते. "दोस्ती"तलच गाणं - "गुडिया हमसे रुठी रहोगी, कबतक ना हसोगी, देखो जी किरन की लहर आयी, आई रे आई रे हसी आई" हे त्या सबजेक्टमुळेच टाकलेय असे वाटायचे. शिवाय नंतरच्या "दिल एक मंदिर" मध्ये मीनाकुमारी ह्रुदय पिळवटून टाकणारी गाणी हॉस्पिटल मध्ये गाते, तेही नर्स नसून, त्यामुळे हे तर पक्कंच होतं की पेशंट मरण्याआधी नातेवाईकाने एक तरी गाणे गायलेच पाहीजे. माझा नाही हा तर, "हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे है, खो बैठे है. तुम कहते हो के ऎसे प्यारको भूल जाओ" या गाण्याचा दोष आहे.

त्याप्रमाणेच, प्रेम हे लग्नाआधीच होतं आणि जर गाणं गायलं तरच ते establish होतं हे त्यावेळेसच्या ’जिंदगी, जहा आरा,’ सिनेमांमुळेच कळले होते. लग्नानंतर प्रेम नाहीसं होतं हा साक्षात्कार मला तिसरी चवथीतच झाला होता, तेही कोणत्याही बोधीव्रुक्षाखाली नं बसता, हे आठवून मला अजूनही भरून येतं. पण ह्या १००८ हेमंतस्वामीची दखल घेतंय कोण?

जहा आरा हा eastmanclour मधला माझा दुसरा सिनेमा. प्रेम हे प्रेमभंग होण्यासाठीच असतं हे universal truth तेव्हा आम्हा सर्वं सिनेबालवीरांना उमगले होते. त्यामुळे एखादी सुंदर मुलगी दिसली आम्ही नकळत विचार करायचो की हिच्यामुळे आपला प्रेमभंग झाला तर हरकत नाही. प्रेम हे कधीच successful होण्यासाठी नसतं हेही तेव्हा सदासर्वदा जाणवत होतं. त्याला कारणही तसलच होतं. आमचे काका, मामा, आत्या ह्यांची senior मित्र-मैत्रीण मंडळी कितीतरी वेळा ह्यात होरपळून निघालेली पाहिली होती.

आता थोडं वर सरकतो १९६५ सालापुढे. तेव्हा असं वाटणं confirm झालं होतं की असं होऊ शकतं कारण सिनेमात ते दाखवलय. पुढे हे स्वत:च ठरवून मोकळा झालो की आपल्याही आयुष्यात हे होऊ शकतं. मग तर सिनेमा पाहण्याची scheme ह्यावरच ठरवली जायची. ’जीने की राह’ मधला जितेंद्र, ’पहचान’ मधला गरीब बिचारा मनोजकुमार, ’एक तारा बोले’ तुणतुणं वाजवणाराही मनोजकुमारच, समोरच्या ’पडोसन’, सायरा बानू जर गवार ’भोला’ सुनिल दत्तला बायको म्हणून मिळते तर मग आपण काय वाईट आहोत हे सुंदर सत्य आम्हा सर्वं मुलांना एकाच वेळेस कळलं होतं. confidence, confidence म्हणतात तो आम्हाला सुनिल दत्त ने दिला होता हे आम्ही कसं बंर विसरू? हे training फ़क्तं अडीच तासात आम्हाला मिळत होतं

दुसरा महत्वाचा factor म्हणजे त्यावेळेसची mood-elevator रुपी superb गाणी! प्रेमभंग झाल्यावर clarionet असेल आणि शम्मीकपूर सारखे "है दुनिया उसीकी, जमाना उसीका, मोहोब्बतमे जो हो गया हो किसीका" हे pub मध्ये गाता येत नसेल तर तो प्रेमभंगच नाही हे ही समजले होते. जर चुकून यदाकदाचित प्रेम जमलंच, तर बोटीत बसून एक तरी solo किंवा duet गाता आलेच पाहीजे, तेही रात्री बेरात्री अथवा ऊटीच्या तलावात ही theory कायम होतीच. "ओ मेहबूबा" हे संगम मधलं गाणं किंवा an evening in paris मधलं "रातके हमसफ़र थकके घर को चले, झूमती आ रही है सुबह प्यारकी" हे गाणं याचं १२०% प्रूफ़ आहे. हां आता ऊटीचं सोडा, आमच्या तीर्थरूपांची ताकद तेव्हा आम्हाला वर्षातून एकदाच नागपुर ते खामगाव रेल्वेच्या थर्ड क्लासने पाठविण्याची होती हे आपण सोयिस्कररित्या विसरून जाऊ. मग पॅरिसला जाणे, व्हिसा घेणे, त्याआधी पासपोर्ट मिळविणे, हे तेव्हाही जमले नाही आताही जमले नाही ही बिकट वस्तुस्थिती स्वत:वर हसायला लावते. theory perfect पण practicals impossible to attend हा syndrome आजही आहेच!

तेव्हा हेवा वाटायचा तो ज्यांना गाणं गाता यायचं त्यांचा. कारण सोपं आहे. "मिलन" पासून ते"आराधना" पर्यंतं, सुंदर मुली त्यालाच मिळणार ज्याला गाता येतं हे accepted होतं. पाचवीत असताना कमी marks मिळविणारा ’महेश केंकरे’ जेव्हा, "अरे बाबा सोर नही शोर" असं ठणकावून सांगत गाण गायचा तेव्हा तमाम लोकल माधुरी दिक्षित ते old मधुबाला त्याच्याकडे मधाळ नजरेने बघायच्या हे चोरट्या नजरेने आम्ही टिपत होतोच.

सौंदर्याच्या कल्पना सुध्धा तेव्हा वेगळ्या नव्हत्याच! थुलथुलीत मीनाकुमारी, थोराड नंदा आम्हाला slimच वाटायच्यात. गाईड बघितल्यानंतर तर वहीदा रेहमान ही जगातली सर्वात सुंदर स्त्री ह्यावर आम्हा सर्व मित्रांच एक्मत व्हायचच. एरवी आम्हा सर्वांचा democracy वर ठाम विश्वास! देव आनंद हा त्याच्या केसांच्या कोंबड्यामुळे हवाहवासा वाटायचा. जीने की राह मधली तनुजा तिच्याभोवती तेव्हा वलय नसल्यामुळे तेवढी सुंदर वाटायची नाही.

उपवर मुलगी ही निदान नंदाईतकी तरी जाडी असली पाहीजे त्याख्रीज तिचे वडील तिच्यासाठी मुलगे बघायला सुरुवातच करणार नाही ही आमची गोड समजूत होती. बायको कशी असावी? तर ती साधनासारखी कपाळावर झुलफ़े ठेवणारी, नाहीतर शर्लिलासारखी sleeveless घालणारी अथवा सायराबानू सारखी ’अल्लड’ तरी असावी ही आमची किमान अपेक्षा होती.

धरमपेठ कॉलेजमध्ये नाटकात कामाबद्दल बक्षिस घेताना (मी तेव्हा सातवीत होतो), एका कॉलेजकन्यकेने स्लीवलेस घलून ते accept केले व ते देणार्या प्रोफ़ेसरांबरोबर shake hand केला तेव्हा तमाम मंडळीनी ती फ़ारच ’जादा’ आहे असा शेरा मारला तेव्हा स्लीवलेसबद्दलचे माझे मत डागाळले.शेकहॅंड हा फ़क्तं उच्छ्रुंकल मुलीच करतात असे वाटले. त्यानंतर मनोमन मी प्रतिद्न्या केली की यापुढे मी कोणत्याही परक्या मुलीशी शेकहॅंड करणार नाही. हो, माझ्यामुळे कुणा मुलीची बदनामी व्हायला नको!.

पण माझ्या आयुष्यातला पहीला शेकहॅंड ज्या परक्या मुलीशी झाला ती air marshal लतीफ़ ह्य़ांची धर्मपत्नी Mrs. Bilkees Lateef . award winning ceremonyत पहीला आल्याबद्दलचे prize घेताना जो शेकहॅंड केला तोही त्या sleeveless मधल्या हाताबरोबर, तेव्हा माझी शेकहॅंड व स्लीवलेस बद्दलची सर्वं वाईट मते आपोआप गळून पडली होती.

तर ही मीनाकुमारीच्या कापलेल्या व नं दिसणार्या करंगळीपसूनच्या बिलकीस लतीफ़ ह्यांच्या sleeveless पर्यंतची साठा उत्तराची कहणी पाचा उत्तरी सुफ़ळ संपूर्णं!

No comments: